मुंबईत विसर्जन सोहळ्यानंतर १८ तासात काढले १४,३७० बॅनर, फलक

मुंबई: मुंबई महानगरातील श्री गणेशोत्सवातील अनंत चतुर्दशी निमित्त प्रमुख मूर्ती विसर्जन आटोपल्यानंतर १७ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीनंतर १२.३० वाजेपासून बॅनर, फलक आणि इतर प्रदर्शित साहित्य हटविण्याची कार्यवाही महानगरपालिकेच्या अनुज्ञापन खात्याने हाती घेतली आहे. या अंतर्गत काल (१८ सप्टेंबर) सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण १४ हजार ३७० इतके साहित्य काढून टाकण्यात आले आहे.
यामध्ये प्रामुख्याने श्री गणेशोत्सवामध्ये प्रदर्शित करण्यासाठी परवानगी दिलेले साहित्य समाविष्ट आहे. परवानगीची मुदत संपल्याने ते काढून टाकण्यात आले आहे. त्या व्यतिरिक्त अनधिकृतरित्या प्रदर्शित केलेले बॅनर, फलक, तात्पुरते प्रवेशद्वार, भित्तीपत्रके अशा सर्व बाबींचा देखील या कार्यवाहीमध्ये समावेश आहे.
अनुज्ञापन खात्याने हटवलेल्या साहित्याचे वर्गीकरण लक्षात घेता धार्मिक स्वरूपाचे ७ हजार ७१५ बॅनर, ३ हजार १७४ फलक (बोर्ड) आणि ५७९ पोस्टर्स; राजकीय स्वरूपाचे ८०७ बॅनर, ७०५ फलक (बोर्ड), ८७ पोस्टर्स; व्यावसायिक स्वरूपाचे २६० बॅनर, २७ फलक (बोर्ड), ३१ पोस्टर्स तसेच ९८५ झेंडे यांचा यामध्ये समावेश आहे. ही कारवाई निरंतर सुरू आहे.
What's Your Reaction?






