एमआयडीसी निवासी भागात पाणी टंचाई, टँकरची मागणी वाढली !

डोंबिवली:एमआयडीसी निवासी भागातील काही ठराविक ठिकाणी पाणी टंचाईचा सामना रहिवाशांना करावा लागत असून रोजच ते गरजेपोटी छोटे-मोठे पाण्याचे टँकर मागवीत आहेत. त्यामुळे पाण्यासाठी अतिरिक्त भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागत आहे. मिलापनगर मधील उस्मा पेट्रोल पंप समोरील रांगेतील सर्व सोसायटी आणि बंगल्याना अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा गेल्या वर्षभरापासून होत आहे. तेथील रहिवासी नेहमी एमआयडीसी पाणी खात्याचा कार्यालयात जावून तक्रारी दिल्या आहेत. अद्याप पाणीपुरवठा मध्ये काहीच सुधारणा होत नसल्याने येथील नागरिक आता हतबल झाले आहेत. एमआयडीसी पाणीपुरवठा खात्याचे उपअभियंता १ए. पि. गोगटे यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही त्यांच्याकडून ही कार्यवाही होत नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. घरडा सर्कल जवळ असलेली जुनी पडीक पाण्याची टाकी पाडून तेथे नवीन जलकुंभ बांधण्याच्या प्रस्ताव एमआयडीसीच्या विचाराधीन असून त्याला मान्यता मिळाली असल्याचे समोर येत आहे. एमआयडीसी निवासी परिसरातील अनेक ठिकाणी अशीच पाण्याची परिस्थिती असून त्यानाही पाण्याचे टँकर मागवावे लागत आहेत. मुख्य म्हणजे पाण्याबरोबर वीजपुरवठा अधून मधून खंडित होत असल्याने नागरिकांत मोठा रोष निर्माण झाला असून येथील नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहोत असे सांगतात. यामध्ये सुधारणा झाली नाही तर एमआयडीसी निवासी मधील नागरिक येणार्या विधानसभा निवडणुकीला मतदानावर बहिष्कार टाकण्याचा विचारतही आहेत.
What's Your Reaction?






