लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या प्रयत्नातून लवकरच वसईतील पाणी पुरवठा सुधारणार
अमृत २.o अंतर्गत जलवाहिन्या अंथरण्याच्या कामाला वेग, शहरांसह गावांचाही पाणी पुरवठा सुधारणार

वसई - वसई विरार शहरातील पाणी वितरण व्यवस्था आता लवकर सुधारणार असून शहरांसोबतच महापालिकेत सामाविष्ट गावांनाही पाणीपुरवठा केला जाणार आहे. अमृत २.o अभियानांतर्गत शहरातील जल वितरण व्यवस्था बळकट आणि विस्तारित करण्यासाठी पालिका क्षेत्रात ९५ किमी मुख्य जलवाहिन्या, ४८७ किमी वितरण जलवाहिन्या आणि १० जलकुंभ उभारले जाणार आहेत. यासाठी प्रत्यक्ष कामाला डिसेंबर २०२४ पासून जलवाहिन्या अंथरण्याचे काम ठेकेदारांमार्फत सुरु करण्यात आले आहे.
लोकनेते हितेंद्र ठाकूर, माजी आमदार क्षितिज ठाकूर आणि माजी आमदार राजेश पाटील यांनी वसई विरारच्या पाणी वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश येत शासनाकडून अमृत २.o पाणीपुरवठा योजना मंजूर करून शासनाने याकामी मार्च २०२३ मध्ये रु. ४९४. १ कोटी इतक्या खर्चाची मान्यता दिली होती. मान्यता दिलेल्या खर्चापैकी ७० % अनुदान रु. ३४५.८८ कोटी इतक्या खर्चाला मंजुरी दिली आहे. एप्रिल २०२४ पासून या कामाला सुरुवात झाली असून डिसेंबर २०२४ पासून प्रत्यक्ष जलवाहिन्या अंथरण्याची कामे सुरु असून आता या कामांना वेग प्राप्त झाला आहे.
एमएमआरडीएकडून पालिकेला सूर्या योजनेतून अतिरिक्त पाणी उपलब्ध झाले आहे. शहरातील विविध भागातील जलवाहिन्या आणि जलकुंभाची जलदाब चाचणी करण्याची कामे सुरु असून ६९ गावांच्या पाणीपुरवठा योजनेतील पालिकेत समाविष्ट ५५ पैकी २६ गावांना यापूर्वीच पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. उर्वरित सर्व गावांमध्ये नव्याने जलवाहिन्या अंथरण्याची व दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यांनतर टप्य्याटप्याने पाणीपुरवठा केला जाणार आहे.
What's Your Reaction?






