वसई - मुंबईची वाढती लोकसंख्या आणि वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण पाहता आता हळूहळू या गुन्हेगारांनी आपला मोर्चा वसई-विरार शहराकडे वळवला असून वाढते वसई-विरार शहर, अनधिकृत बांधकामे आणि वाढती लोकसंख्या यामुळे गुन्हेगारीसाठी मुंबईतील अट्टल चोरांनी आणि सराईत गुन्हेगारांनी आपले लक्ष्य वसईकडे वळविले आहे.
वसईतील वाढती गुन्हेगारी
नोव्हेंबर २०२४ पर्यंत ११ महिन्यांच्या कालावधीत अपहरणाचे ३५२ आणि खंडणीचे १३ गुन्हे घडले असून, अब्जावधी रुपयांचे अम्लाची पदार्थ पकडण्यात आणि अमली पदार्थांची तस्करी रोखण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, असे असले तरीही शहरात खून, दरोडा, चेन स्नॅचिंग, घरफोडीची प्रकरणे, बोगस पोलिसांकडून होणारी सायबर फसवणूक, अमली पदार्थांची तस्करी याशिवाय अपहरण आणि खंडणीच्या घटनाही वाढल्या आहेत.
वसई क्षेत्रात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये अनेकदा भीतीचे वातावरण निर्माण होते. वाढत्या शहरीकरणामुळे तसेच बकाल वस्त्यांमुळे चोरांसाठी हे शहर सुरक्षित अड्डा बनत चालले आहे. या घटनांमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नाला आता मोठे आव्हान निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
मीरा भाईंदर - वसई विरार आयुक्तालय झाल्यानंतर अनेक घटनांमध्ये पोलिसांनी उत्तम कामगिरी बजाविली असली तरीही वाढत्या गुन्हेगारीच्या घटना रोखण्यात अजूनही पोलिसांना पूर्णपणे यश मिळालेले नाही. अपहरणाच्या ३५२ घटनांपैकी फक्त १३ आरोपीना अटक करण्यात आली आहे. खंडणीचे गुन्हे आणि बांगलादेशी नागरिकांचे बेकायदा वास्तव्य आता पोलीस आणि नागरिकांसाठी मोठीच समस्या झाली आहे. या प्रश्नांवर त्वरित लक्ष घालून गुन्हेगारी घटनांना आळा घालावा अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.
यामुळे येत्या काळात मुबंईतील गुन्हेगारांना थोपविण्याचे मोठे आव्हान आता मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालया पुढे असणार आहे.
Previous
Article