विरार: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाने वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना अधिक काळजी घेण्याची सूचना केली आहे. फेब्रुवारी महिन्यापासून राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानात वाढ झाली आहे. विशेषतः, उष्णतेमुळे शरीराच्या तापमानात 45 अंश सेल्सियसपेक्षा अधिक वाढ झाल्यास यास उष्णतेची लाट असे संबोधले जाते. अशा परिस्थितीत उष्माघात हा एक मोठा धोका होऊ शकतो.

उन्हाळ्याच्या दिवसांत उष्माघात हा शरीरासाठी गंभीर समस्या ठरतो. उष्णतेमुळे शरीरातील पाणी कमी झाल्यास उष्माघाताचा धोका अधिक वाढतो. त्यासाठी वसई-विरार शहर महानगरपालिकेने नागरिकांना काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.

उष्माघाताची लक्षणे:

  1. थकवा येणे आणि तहान लागणे
  2. उष्णतेमुळे शरीरावर रॅश येणे
  3. चक्कर येणे
  4. त्वचा लाल होणे
  5. लहान मुले, गरोदर स्त्रिया, वयोवृद्ध व्यक्तींमध्ये उष्माघात होण्याची शक्यता जास्त असते.

उन्हाळ्यात बाहेर जाताना खालील गोष्टी लक्षात ठेवा:

काय करावे?

  1. पिण्याचे पाणी, ज्यूस, ओ.आर.एस, लिंबूपाणी सोबत ठेवा आणि हायड्रेट राहा.
  2. पातळ, सैल सुती कपडे घाला.
  3. सूर्यप्रकाशाचा थेट संपर्क टाळण्यासाठी छत्री, टोपी, किंवा टॉवेल वापरा.
  4. अनवाणी बाहेर जाऊ नका.
  5. शरीराला थंडावा देण्यासाठी पंखे आणि ओल्या कपड्याचा वापर करा.
  6. घराबाहेर पडण्यापूर्वी भरपूर पाणी प्या.
  7. घराला थंड ठेवा, पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि खिडक्या उघड्या ठेवा.
  8. बाहेर जाताना नेहमी पाणी सोबत ठेवा.

काय करू नये?

  1. दारू, चहा, कॉफी आणि शितपिये टाळा, कारण ते शरीराला हानी पोहचवू शकतात.
  2. कडक उन्हात बाहेर जाणे टाळा.
  3. रिकाम्या पोटी उन्हात बाहेर पडू नका.

वसई-विरार शहर महानगरपालिका नागरिकांना आवाहन करत आहे की, उष्णतेमुळे होणारी हानी टाळण्यासाठी योग्य काळजी घ्या आणि आपल्या आरोग्याचे रक्षण करा.