गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वसई-विरारमध्ये खड्डेमुक्त रस्त्यांसाठी महापालिकेची युद्धपातळीवर तयारी
वसई-विरार, १६ ऑगस्ट २०२५: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वसई विरार शहरात नागरिकांना सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासनाने युद्धपातळीवर रस्त्यांच्या डागडुजीचे काम हाती घेतले आहे.
पावसाळ्यात निर्माण झालेल्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर त्वरित उपाययोजना म्हणून महापालिकेने ठिकठिकाणी खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे. मा. आयुक्त मनोजकुमार सुर्यवंशी (भा.प्र.से.) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात मोठ्या प्रमाणावर दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर आहेत.
महापालिकेच्या अहवालानुसार, या आठवड्यात ८५४ खड्ड्यांची डागडुजी करण्यात आली असून, खडीकरण व डांबरीकरणाच्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्यात आले आहे. शहरातील सर्व विभाग समन्वय साधून नागरिकांना खड्डेमुक्त प्रवास मिळावा यासाठी प्रयत्नशील आहेत.
महानगरपालिकेने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, गणेशोत्सव काळात कोणतीही अडथळे न येता वाहतूक सुरळीत चालावी यासाठी प्रशासन सतर्क आहे.
What's Your Reaction?






