पालघर जिल्ह्यात एकूण ६६. ६३ टक्के मतदान

पालघर - सागरी, नागरी आणि डोंगरी अशा तीन भागात असणाऱ्या पालघर जिल्ह्यात काल एकूण ६६. ६३ टक्के इतके मतदान झाले. सर्वाधिक मतदान विक्रमगड मतदारसंघात झाले असून विक्रमगड येथील मतदानाची टक्केवारी ७७.९५ इतकी आहे तर नालासोपाऱ्यात सर्वाधिक कमी मतदान झाले असून तेथील टक्केवारी ५७. ३७ इतकी आहे. जिल्ह्यात सकाळी पहिले दोन तास अनेक मतदान केंद्रावर मतदारांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र होते. सकाळी ९ वाजेपर्यंत जिल्ह्यात केवळ ७.३० टक्के मतदान झाले होते. सकाळी ११ वाजेपर्यंत १९.४० टक्के, १ वाजता ३३.४० टक्के आणि संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५९.३१ टक्के इतके मतदान झाल्याने दुपारनंतर मतदारांनी घराबाहेर पडत आपला मतदानाचा हक्क बजावल्याचे चित्र पाहायला मिळाले.
पालघर जिल्ह्यात डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा आणि वसई असे एकूण सह विधानसभा मतदारसंघ असून मतदारांची संख्या २२ लाख ९२ हजार ६६ इतकी आहे. सकाळी मतदान सुरु झाल्यानंतर सकाळी ९ पर्यंत सर्वाधिक ८.३२ टक्के मतदान वसई मतदारसंघात तर सरावात कमी मतदान पालघर मतदारसंघात ५.९४ टक्के इतके झाले.
जिल्ह्यातील पश्चिमेकडील शहरी तसेच निमशहरी भागात जिल्हा प्रशासनाने मतदान केंद्रात पिण्याचे पाणी, विजेची सोय, जेष्ठाना बसण्याची सोय तसेच अनेक ठिकाणी उन्हापासून मतदारांचे संरक्षण व्हावे यासाठी मंडपही उभारण्यात आले होते. असे असले तरीही पूर्वेकडील काही भागांमध्ये काही सुविधांचा अभाव असल्याचे दिसून आले त्यामुळे काही ठिकाणी मतदारांना अडचणींचा सामना करावा लागला.
पालघर जिल्ह्यातून सहाही मतदारसंघातून विविध राजकीय पक्षाचे एकूण ५३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. जनतेचा कौल कुणाच्या बाजूने आहे हे २३ नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे.
जिल्हयातील कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान ?
डहाणू - ७३.३४ %
विक्रमगड - ७७.९५ %
पालघर - ७१.५८ %
बोईसर - ६७.५० %
नालासोपारा - ५७.३७ %
वसई - ६१.४९ %
What's Your Reaction?






