७६ वर्षांचे निवृत्त नौदल अधिकारी गोरखनाथ मोरे बारावी उत्तीर्ण, आता वकील होण्याची तयारी

सोमवारी राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १२वीच्या परिक्षेचा निकाल लागला. या निकालात उत्तीर्ण झालेली मुले आनंद साजरा करत होती. मात्र या आंनदोत्सवात एक आजोबाही सहभागी झाले होेते. ७६ वर्षांच्या या आजोबांचा नातू उत्तीर्ण झाला असे वाटेल. परंतु त्यांचा नातू नाही तर खुद्द आजोबाच १२ वीची परिक्षा उत्तीर्ण झाले होते. या परीक्षेत त्यांना ४५% मार्क पडले . या आजोबांचे नाव आहे गोरखनाथ मोरे. विशेष म्हणजे हे आजोबा ३२ वर्ष भारतीय नौदलात सेवा बजावून निवृत्त झाले आहे.
गोरखनाथ मोरे हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील. त्यांचा जन्म १९४७ मध्ये झाला. त्यांनी ११ वी पर्यंत महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर त्याने देशसेवेचे वेड लागले. त्या ध्यासापोटी ते भारतीय नौदलात रूजा झाले. ३२ वर्ष ते नौदलात नोकरी करत होते. त्या काळात ते कुलाबा येथे रहात होते. १९९७ मध्ये ते सेवानिवृत्त झाल्यानंतर ते आपल्या कुटुंबासह भाईंदर येथे रहायला आले. नौदलात लवकर नोकरी लागल्याने त्यांना शिक्षण घेता आले नव्हते.
पुढे संसाराच्या रहाटगाडग्यात अडकलेल्या मोरे यांना शिक्षणाचे महत्व माहित होते. त्यांनी दोन्ही मुलांना चांगले शिक्षण दिले. मोरे यांना दोन मुले आहेत. मुलगा नितेश मोरे हा देखील भारतीय नेव्हीत कर्तव्यावर आहे.मुलगी आरती या डाॕक्टर असून त्यांचे नायगाव पश्चिम येथे दवाखाना आहे गतवर्षी नायगाव येथील ऋषि वाल्मिकी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे संचालक रवी भाटकर हे डाॕ.आरती मोरे यांच्या दवाखान्यात गेले असताना वडिलांना पुन्हा पुढील शिक्षण घ्यायचे असून कला शाखेतून बारावीची परीक्षा द्यायची असल्याचे सांगितले. रवी भाटकर यांनी लगेच त्यांची कागदपत्रे जमा करुन बोर्डात परीक्षा विभागाकडे पाठवून दिली.
त्यानंतर त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करुन मार्च २०२५ च्या परीक्षेसाठी बोर्डाकडून परवानगी घेतली. गोरखनाथ मोरे यांनी वसईतील न्यु इंग्लीश स्कुल मध्ये त्यांनी परीक्षा दिली होती.या परीक्षेत त्यांना ४५% मार्क पडले आहेत.
शिक्षणाला वयाचं बंधन नसतं असं मोरे सांगतात. माझी प्रकृती ठणठणीत आहे आता यापुढे मला वकील बनवायचे असून मी त्याची तयारी करणार आहे, असे मोरे यांनी सांगितले.
What's Your Reaction?






