दहिहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोविंदा पथकांसाठी विमा संरक्षण विषयक महत्त्वपूर्ण बैठक वसई विरार महापालिकेत

वसई: येत्या १६ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा होणाऱ्या दहीहंडी उत्सवानिमित्त वसई विरार शहर महानगरपालिकेने गोविंदा पथकांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून, यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या क्रीडा विभागामार्फत ही बैठक शुक्रवार, दि. ४ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता वसई विरार शहर महानगरपालिकेच्या यशवंत नगर, विरार (पश्चिम) येथील मुख्यालयाच्या चौथ्या मजल्यावरील सर्वसाधारण सभागृहात होणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मा. आयुक्त तथा प्रशासक राहणार आहेत.
दहीहंडी उत्सवात भाग घेणाऱ्या गोविंदा पथकांवर दरवर्षी जोखीम असते. त्यांची सुरक्षितता लक्षात घेता दरवर्षीप्रमाणे यंदाही महानगरपालिका विमा संरक्षण प्रदान करण्याच्या तयारीत आहे. उत्सवाच्या अनुषंगाने होणाऱ्या या संयुक्त बैठकीस गोविंदा पथकांचे प्रतिनिधी, दहीहंडी उत्सवाचे आयोजक, स्थानिक पोलिस विभाग, वाहतूक विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, अग्निशमन विभाग व इतर संबंधित विभागांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
महानगरपालिकेने संबंधित सर्व प्रतिनिधींना या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून उत्सव शांततामय व सुरक्षित वातावरणात पार पडू शकेल.
What's Your Reaction?






