वसईत भीषण आग, ३० ते ३५ झोपड्या जळून खाक; गोरगरिबांचे संसार उध्वस्त

वसई (मुंबई), १६ मार्च: वसई पश्चिमेतील दत्तानी मॉलच्या मागील बाजूस असलेल्या झोपड्यांना शनिवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत ३० ते ३५ झोपड्या जळून खाक झाल्या असून अनेक गोरगरीब कुटुंबांचे संसार उध्वस्त झाले आहेत.
दत्तानी मॉलच्या मागील मोकळ्या जागेत मोल मजुरी करणारे बांधव झोपड्या बांधून राहत होते. अचानक आग लागल्याने या परिसरात मोठी खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानंतर ताम तलाव येथील अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले. आगीची तीव्रता पाहता सनसिटी व नवघर अग्निशमन केंद्राची मदत घेण्यात आली. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणली गेली.
सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही. परंतु ३० ते ३५ झोपड्यांतील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. या आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून, स्थानिकांच्या दृष्टीने आग लागली की लावली, यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
वसई विरार आणि आसपासच्या भागात शेती वाडी, मोलमजुरी आणि इतर कामांसाठी पालघर जिल्ह्यासह इतर ठिकाणाहून लोक स्थलांतर करून येतात. या भागातील मोकळ्या जागेत त्यांनी झोपड्या बांधून आपला उदरनिर्वाह चालवला आहे. या आगीत अनेक गरीब कुटुंबांचा मोठा तोटा झाला आहे, ज्यामध्ये त्यांचे घरातील सर्व सामग्री जळून खाक झाली आहे.
आगीची नेमकी कारणे आणि नुकसानाचा तपशील मिळवण्यासाठी पोलिस आणि महापालिकेचे अधिकारी पुढील चौकशी करत आहेत.
What's Your Reaction?






