गणेशोत्सव काळात सात दिवसांत २१ हजार किलो निर्माल्य संकलित! बचत गटाच्या महिलांमार्फत, निर्माल्यापासून खत निर्मिती प्रक्रिया सुरू
विरार:वसई-विरार शहरात जल्लोषपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा होत असून, महापालिका पर्यावरणपूरक गणेशोत्सव राबवत आहे. गणेशोत्सव काळात वसई विरार शहर महानगरपालिकेने संकलित झालेल्या निर्माल्यापासून खत निर्मिती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मागील सात दिवसात विसर्जनादरम्यान २१ हजार किलो निर्माल्य संकलित झाले आहे. बचत गटांच्या महिलांमार्फत ही खतनिर्मितीची प्रक्रिया सुरू झाली आहे. याशिवाय निर्माल्यातील टाकाऊ वस्तूंपासून विविध गृहोपयोगी वस्तू देखील तयार केल्या जात आहेत. एकिकडे कृत्रिम तलावामुळे नैसर्गिक तलाव, खाड्यांचे संरक्षण केले जात असून निर्माल्यापासून खतनिर्मितीमुळे महापालिकेचा गणेशोत्सव खर्या अर्थाने पर्यावरणपूरक ठरत आहे.
पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे वसई विरार शहर महानगरपालिकेचे हे तिसरे वर्ष आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून विसर्जनादरम्यान जमा होणारे निर्माल्य संकलित करून त्यापासून महिला बचत गटांमार्फत खतनिर्मिती करण्यात येते. शहर महानगरपालिकेने विसर्जनाकरिता १०५ कृत्रिम तलाव उभारले असून, त्या ठिकाणी निर्माल्य संकलित करण्यासाठी निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. यासह नैसर्गिक तलाव, खाडी, समुद्र आदी जेथे विसर्जन होते तेथेही निर्माल्य कलश ठेवण्यात आलेले आहेत.
यंदाच्या गणेशोत्सवात दीड दिवसीय, पाच दिवसीय, गौरी-गणपती आणि सात दिवसीय विसर्जनादरम्यान साधारण २१ हजार किलो निर्माल्य संकलित झाले आहे. या निर्माल्यापासून शहरात विविध ठिकाणी ८ बचत गटाच्या ५७ महिलांमार्फत खत निर्मिती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. खत निर्मितीसाठी महिलांना जागा आणि साहित्य महानगरपालिकेने उपलब्ध करून दिले आहे. महापालिकेचे स्वच्छता दूत बचत गटातील महिलांना खत निर्मितीचे आणि वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण देतात. या प्रशिक्षण मिळवलेल्या बचत गटाच्या महिलांना निर्माल्याापासून तयार झालेल्या खताची विक्री करून आर्थिक फायदा मिळतो.
टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू
निर्माल्य कलशात निर्माल्यासह प्लास्टिकच्या, सजावटीच्या आणि इतर टाकाऊ वस्तू सापडतात. यापासून विविध वापर करण्याजोग्या वस्तू बचत गटाच्या महिलांमार्फत तयार केल्या जात आहेत. टाकाऊपासून विविध गृहोपयोगी वस्तू, आभूषणे आदी बनविले जाते आहेत. या वस्तुंच्या विक्रीतून महिलांना आर्थिक उत्पन्नही मिळणार आहे.
मागील वर्षी २३ हजार किलो निर्माल्य संकलित झाले होते आणि त्यापासून ४ हजार ८०० किलो खत तयार करण्यात आले होते. हे खत महापालिका क्षेत्रातील उद्यानांमध्ये वापरण्यात आले होते. तसेच नागरिक आणि शेतकऱ्यांना खताची विक्री करण्यात आली होती, ज्याद्वारे बचत गटाच्या महिलांना अर्थार्जन झाले.
- नानासाहेब कामठे, उपायुक्त, वसई विरार शहर महानगरपालिका.
What's Your Reaction?






