अर्नाळा वटारमध्ये विजेचा शॉक लागून तरुण कर्मचाऱ्याचा मृत्यू, तिघे जखमी

अर्नाळा, ३० मे: अतिशय दुर्दैवी घटनेत अर्नाळा येथील वटार विभागात ट्रान्सफॉर्मरवर काम करत असलेल्या MSEB (महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ) च्या चार कर्मचाऱ्यांना विजेचा जोरदार शॉक लागल्याची घटना घडली आहे. या अपघातात अर्नाळा-जांभूळपाडा येथील जयेश घरत या तरुण कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, इतर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
ही घटना आज सकाळच्या सुमारास धसपाडा येथे घडली. MSEB वटार विभागाचे हे चार कर्मचारी ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीचे काम करत होते. काम सुरु असताना अचानक विजेचा प्रवाह सुरु झाल्याने चौघांनाही जोरदार शॉक बसला. या भीषण धक्क्याने तिघे कर्मचारी थेट पोलवरून खाली फेकले गेले, तर जयेश घरत यांचा जागीच मृत्यू झाला.
जखमी कर्मचाऱ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे अर्नाळा व वटार परिसरात शोककळा पसरली आहे. जयेश घरत हे आपल्या कर्तव्यनिष्ठ आणि विनम्र स्वभावासाठी परिचित होते, त्यांच्या आकस्मिक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
स्थानिक प्रशासन आणि MSEB प्रशासनाकडून या दुर्घटनेची चौकशी सुरु असून, सुरक्षेच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
What's Your Reaction?






