वसई - २९ गावांचा वसई विरार महापालिकेत समाविष्ट करण्याच्या निर्णयावर ३१ हजार हरकती आल्या आहेत. या हरकतींवर सोमवार १६ डिसेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी घेतली जाणार आहे. यासाठी वसई विरार महापालिकेने १५ पथकांची नियुक्ती केली आहे. 

वसई विरार शहर महानगरपालिकेमधील ५५ गावांपैकी वगळलेली २९ गावे महानगरपालिका हद्दीत पुनश्चः समाविष्ट करण्याबाबत १४ फेब्रुवारी रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. गावांचा महापालिकेत समावेश केल्यांतर १४ फेब्रुवारी २०२४ ते १४ मार्च २०२४ या कालावधीत ३१ हजार ३८९ हरकती आणि सूचना आल्या होत्या. त्यात गावे महापालिकेतून वगळू नयेत यासाठी ११ हजार ५९१ तर वगळण्यात यावीत  यासाठी १९ हजार ७९८ अर्ज प्राप्त झाले होते. या हरकती आणि सूचनांवर आता पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी घेतली जाणार आहे. ही सुनावणी १६ डिसेंबर ते २० डिसेंबरपर्यंत घेतली जाणार आहे. 

या हरकतींवरील सुनावणीसाठी वसई विरार महापालिकेने जय्यत तयारी केली आही. ३१ हजार हरकती असल्याने त्यावर सुनावणी घेण्यासाठी १५ पथके व १ राखीव पथक कक्ष स्थापन केलेले आहे. या १५ पथकांचे प्रमुख म्हणून उपायुक्त सुभाष जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकात सहाय्यक आयुक्त, प्रभारी सहाय्यक आयुक्त, अधिक्षक, वरिष्ठ लिपिक, लिपिक-टंकलेखक आणि शिपाई यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रत्येक पथकाला २ हजार अर्ज विभागून देण्यात आले आहे. सकाळी १० ते संध्याकाळी साडेपाच या वेळेत ही सुनावणी होणार आहे. ज्या नागरिकांनी हरकती नोंदविल्या असतील त्यांना कार्यालयात उपस्थित राहता येणार आहे.